रत्नागिरी तालुक्यातील गोळप-नवेदरवाडी येथील शेतकरी हरिचंद्र गोरिवले हे प्रयोगशील शेतकरी असून ते आपल्या क्षेत्रामध्ये दरवर्षी ४० गुंठ्यांमध्ये भात लागवड करतात. या लाल मातीमध्ये लाल भात कोमल रत्नागिरी ३ अशा प्रकारच्या भाताच्या वाणाची लागवड करतात. यावर्षी रत्नागिरी येथे मे महिन्यामध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये एका बचतगटाच्या माध्यमातून पाचशे रुपये किलोप्रमाणे काळ्या भाताचे बियाणे विकत घेतले आणि प्रायोगिक तत्त्वावर तीन गुंठ्यामध्ये भाताची कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रित लागवड केली.
यांनी प्रायोगिक तत्त्वावर आपल्या प्रक्षेत्रावर तीन गुंठ्यामध्ये काळ्या भाताची लागवड केली होती. त्याचा उत्पन्नाच्यादृष्टीने चांगला फायदा झाला असून तीन गुंठ्याच्या प्रक्षेत्रामध्ये १६० किलो तांदूळ उत्पादित प्रयोगाला यश आल्याने समाधान व्यक्त केले. यावर्षी त्यांनी मसूर आणि मूग शेतीचा प्रयोग केला असून त्याची पेरणी झाली आहे.
जुलैमध्ये लागवड केल्यानंतर पीक भरघोस घेण्याकरिता सुफला, युरिया ही खते, शेणखत व गांडूळखताचा योग्य तऱ्हेने वापर तसेच पिकाला पोषक वातावरण यामुळे उत्पादनाला चांगली गती मिळाल्याचे सांगितले. ११० दिवसानंतर भात चांगल्याप्रकारे तयार झाल्यानंतर त्याची कापणी करण्यात आली.
या संदर्भात गोरिवले म्हणाले, या वाणापासून तयार होणारा काळा तांदूळ हा औषधी असून मधुमेही, हृदयरोग या रुग्णांकरिता फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याला चारशे ते पाचशे रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. या प्रायोगिक तत्त्वावर लागवड केलेल्या पिकांमधून अपेक्षेपेक्षा चांगले उत्पादन मिळाले. त्यामुळे कृषी विभागाने मसूर व मूग ही बियाणे मोफत दिल्यामुळे त्याची पेरणी करणार असल्याचे सांगितले. जेणेकरून भातपिकानंतर क्षेत्रांमध्ये पाण्याचा योग्य तो वापर करून कडधान्य पीक घेणार असल्याचे सांगितले.