शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची ” सुमारे ५४ लाखांची साडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्यास ठेकेदाराकडून दिरंगाई झाली होती. आता पावसाळा तोंडावर आल्यानंतर ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक खोदाई पूर्ण झाली असली तरीही उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली नाही तर विनाअडथळा हे काम मे अखेरीस पूर्ण होईल अन्यथा मागीलवेळी प्रमाणेच पाण्याची पाईप पुन्हा वाहून जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहराला शीळ धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे. सुधारित पाणीयोजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्याच्या कामांचा समावेश आहे. मागील पावसाळ्यात टाकलेली पाईपलाईन वाहून गेली होती.
त्यामुळे वर्षभरात तिथे पाईपलाईन टाकणे आवश्यक होते; परंतु नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाऊस तोंडावर आला तरीही काम पूर्ण झालेले नाही. सध्या पर्याय म्हणून ६ फ्लोटिंग पंपांद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. या पंपांच्या वीजबिलापोटी महिन्याला १० ते १२ लाखांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. यापोटी वर्षाला दीड कोटी रुपये मोजावे लागले आहेत. ५४ लाखांच्या कामासाठी पालिकेकडून तिप्पट खर्च केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा पाऊस लवकर दाखल होणार आहे. तरीही पाईपलाईन टाकण्याचे काम विलंबाने सुरू करण्यात आले.
मे अखेरीस काम पूर्ण होईल… – ही पाईपलाईन टाकली गेली नाही तर धरणातील पाणी थेट नागरिकांना द्यावे लागणार आहे. दरम्यान, हे काम मे अखेरीस पूर्ण होईल, असा दावा नगरपालिका प्रशासनाकडून केला जात आहे.