कोकणात शेती हा प्रमुख व्यवसाय असून, त्यामध्ये अद्ययावत यंत्रणा, बी-बियाणी वापरून विविध प्रयोग केले जातात. हल्ली शेतकरी देखील प्रयोगशील झाल्याने, बारमाही विविध प्रकारची पिके घेण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दिवसेंदिवस शेतीकामांकरिता मजुरांची कमतरता भासत आहे. त्याप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरिकीकरण तसेच कृषी क्षेत्रात मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकरी चिखळणी, उखळणी, लागवड, फवारणी व काढणीसह सर्व प्रकारच्या कामाकरिता यंत्रांचा वापर करताना दिसतात.
या सर्व बाबी लक्षात घेता कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण तसेच राष्ट्रीय कृषी योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत वैयक्तिक कृषी अवजारे, कृषी अवजारे बँक स्थापनेकरिता शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते. वाढती महागाई, शेतीचा खर्च वाढत असल्यामुळे शेतीत यांत्रिकीकरणाकडील ओढा वाढला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध प्रकारच्या शेतीतील यंत्र खरेदीसाठी कृषी विभागाकडून ४ कोटी ३ लाख ६३ हजारांचा निधी लाभार्थींच्या खाती वर्ग करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी २०२२-२३ या वर्षाकरिता कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेंतर्गत एकूण १ कोटी ५९ लाख ८० हजार, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ६० लाख ३६ हजार व राष्ट्रीय कृषी योजना कृषी यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ३ लाख ५६ हजार, असे एकूण ४ कोटी २१ लाख २५ हजार निधी प्रस्तावित आहे.
त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेंतर्गत एकूण १ कोटी ५९ लाख ८० हजार, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ४४ लाख ९२ हजार व राष्ट्रीय कृषी योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एकूण ९८ लाख ९१ हजार असे एकूण ४ कोटी ३ लाख ६३ हजारांचा निधी लाभार्थींच्या खाती रक्कम वर्ग केला आहे.
शेतकऱ्यांना माफक दरात भाडे तत्त्वावर अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी अवजारे बँक उपलब्ध आहेत. या योजनेचा ऑनलाईन लाभ घेता येणार आहे. यासाठी महाबिडी संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावयाची असते. जिल्ह्यात कृषी क्षेत्रामध्ये कृषी यांत्रिकीकरण वाढत असल्याने यंत्र खरेदी योजनाना महत्व दिले जात आहे.