इंधनवाढीचा फटका सर्वच स्तरांमध्ये बसत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या दर वाढीमुळे अनेकांनी सीएनजी वाहने देखील खरेदी केली आहेत. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जनता एक तर इलेक्ट्रिक वाहन किंवा सीएनजी वर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्याकडे वळली आहे.
कोरोनातील परिस्थितीमुळे तिजोरीवर पडलेला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एक हजार गाड्या ‘सीएनजी’त रूपांतरित करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्या दृष्टीने रत्नागिरीतही हालचाली सुरू झाल्या असून, ‘एसटी’च्या विभागीय कार्यालयाशेजारी सीएनजी गॅस पंपाच्या उभारणीचे काम सुरू झाले. त्याचप्रमाणे रत्नागिरी विभागाने सीएनजीवर चालणाऱ्या २०० बसची मागणी देखील केली आहे. त्याबरोबरच सुमारे १२५ ते २०० इलेक्ट्रिक बसची मागणी महामंडळाकडून करण्यात आली आहे. पर्यावरण पूरक प्रवास आणि इंधनाच्या खर्चाची बचत हे समीकरण डोळ्यासमोर ठेवून हि मागणी करण्यात आली आहे.
इंधनावरील खर्च कमी करण्यासोबत प्रदूषणमुक्त गाड्या वापरावर भर देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्या अंतर्गत रत्नागिरी विभागात ‘सीएनजी’ व इलेक्ट्रिक गाड्या लवकरच एसटी विभागाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यादृष्टीने आवश्यक तयारी आणि सीएनजी पंपाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
कोरोना टाळेबंदीमुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. त्याचा विपरित परिणाम उत्पन्नावर झाला. डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होते. महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या १७ हजार बस असून, डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या ३४ टक्के इतका आहे. डिझेलच्या किमती वाढत असल्याने हा खर्च ३८ ते ४० टक्क्यांवर पोचला. हा करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी ‘सीएनजी’बरोबरच इलेक्ट्रिक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणाऱ्या बसचा विचार केला जात आहे.