मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून वेगाने सुरू आहे. ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण असताना तालुक्यातील हातिवले येथे उभारण्यात आलेल्या नाक्यावर टोलवसुलीला सुरुवात होणार आहे. टोल वसुलीबाबतची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून प्रसिद्ध झाली आहे; मात्र आज टोल वसुली सुरू झाली नसून येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष टोलवसुली सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यामध्येही हे चौपदरीकरणाचे काम करण्यात येत असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांकडून टोलवसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोलनाका उभारलेला आहे. या टोलनाक्याचे कामही पूर्ण झाले असून टोल वसुलीचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे.
दरम्यान, यापूर्वी एक जूनपासून या टोलनाक्यावर टोलवसुलीला सुरवात करण्यात येणार होती; मात्र, सर्व राजकीय पक्षांनी त्या वेळी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष टोलवसुलीला सुरवात झाली नव्हती. त्यानंतर संबंधित कंपनीला पोलिस कुमक घेत टोल वसुलीचे आदेश दिले होते; मात्र, या वेळीही जोरदारपणे विरोध झाला होता. त्यामुळे त्या वेळी टोल वसुलीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा टोल वसुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये गुरुवार ता. १ पासून टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याची अधिसूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून प्रसिद्ध केली आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप टोलवसुली सुरू झालेली नाही.