रत्नागिरी येथील जिल्हा विशेष कारागृहात गुन्हेगार म्हणून कैद्यांची खाण्याची आबाळ न करता त्यांना पोषक आणि सकस आहार दिला जातो. येथे सध्या २२५ कैदी आहेत. त्यांच्यासाठी दररोज ५० किलो तांदूळ रांधला जातो. तर ३५ किलो गव्हाचे पीठ लागते. कारागृहातील बंदिवानांच्या आरोग्याची काळजी कारागृह प्रशासन घेत आहे. महाराष्ट्र नियमावलीनुसार घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून कैद्यांना आहार दिला जातो.
जिल्हा विशेष कारागृहाला काही वर्षापूर्वीच खुल्या कारागृहाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या कारागृहामध्ये शेती करण्यासाठी शिक्षा संपत आलेले २० कैदी आणण्यात आले आहेत. गेल्या वर्षी तर सुमारे १५ लाखांहून अधिक शेती उत्पन्न घेण्यात आले. कोरोना काळातही कैद्यांची विशेष काळजी घेण्यात आली होती. कारागृह प्रशासन कैद्यांबाबत संवेदनशील आणि दक्ष असते.
कारागृहात केवळ सराईत गुन्हेगारच असतात असे नाही तर काहीवेळा नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणारेही काही बंदिवान असतात. गुन्हेगार किंवा बंदिवान म्हणून वागणूक न देता त्यांच्या आहाराबाबत कारागृह प्रशासन विशेष लक्ष देवून असते. येथील विशेष कारागृहातील १० महिलांसह २२५ बंदिजनांसाठी दररोज ५० किला तांदूळ आणि ३५ किलो गहू लागतो. कैद्यांच्या संख्येनुसार धान्याची मागणी केली जाते. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या डाळी आणि भाज्यांचा समावेश असतो. या ब्रिटिशकालीन कारागृहात २५० कैद्यांची क्षमता आहे.
महाराष्ट्र कारागृह नियमावलीने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून कैद्यांना आहार दिला जातो. कारागृहातील प्रत्येक कैद्याला सकाळी नाश्ता, दूध, चहा दिला जातो तर दुपारी आणि रात्री पोटभर जेवण दिले जाते. यात चपात्या, भात, डाळ, पालेभाज्या यांचा समावेश असतो.