रत्नागिरी जिल्ह्यात पूरक वातावरणानुसार, मासेमारी पुन्हा सूरु झाली असून, नवीन हंगामाची सुरूवात झाल्यावर मच्छीमारांना बर्फ, इंधन, जाळ्यांची दुरुस्ती, नौकांची दुरुस्ती यासाठी पैशांची गरज भासते. त्यासाठी अनेकवेळा छोटे आणि मध्यम स्वरुपाचे मच्छीमार खासगी लोकांवर किंवा सावकारांवर अवलंबून राहतात. परंतु, शहरात व्यापारी व्यवसाय तेजीत असून, व्याज अधिक असल्याने मच्छीमारांना मोठा फटका बसण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने किसान क्रेडीट कार्ड योजनेमधून मच्छीमारांना कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मच्छीमारांची सावकारी किंवा खासगी लोकांच्या कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी शासनाने शेतकर्यांप्रमाणे किसान क्रेडीट कार्ड योजनेतून खेळते भांडवले उपलब्ध करून देण्याच्या योजनेला रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण ४६३ मच्छीमारांनी तब्बल ६ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज उचलले होते. गतवर्षीपेक्षा दुप्पट मच्छीमारांना याचा लाभ दिला गेला आहे. मत्स्य विभागाकडून याचे संपूर्ण नियोजन केले जात आहे.
मागील दोन वर्षापासून आलेली नैसर्गिक आपत्ती आणि कोरोनाच्या संकटामुळे हा व्यवसाय अडचणीत आला होता. परंतु आत्ता यासाठी वातावरण पूरक असल्याने मच्छीमार समुद्रात जाऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांचे नियमित व्यवहारही चालू झाले कि, हजारापासून लाखापर्यंतचे कर्ज या माध्यमातून बँकांकडून दिले जाते. मागील वर्षी २६६ मच्छीमारांना खेळते भांडवले दिले गेले होते. यंदा त्यात दुप्पट वाढ झाली असून एकूण ४६३ मच्छीमारांना सहा कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज विविध बँकांनी उपलब्ध करून दिले आहे.
हंगामापूर्वी नौका व जाळ्यांच्या छोट्या-छोट्या दुरुस्त्या करता आल्याने, हि योजना मच्छीमारांसाठी फायदेशीर ठरली आहे. सहाय्यक मत्स्य कार्यालयाकडून मच्छीमारांशी संपर्क साधत मच्छीमारांना लाभ देण्यासाठी बँक आणि मच्छीमार यांच्यात दुवा म्हणून काम केले जात आहे. कोरोना कालावधीत मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी ही योजना केंद्र शासनाने हाती घेतली होती. पहिल्या वर्षी त्याला कमी प्रतिसाद मिळाला होता.