एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर काल रत्नागिरी विभागामध्ये ९६४ कर्मचारी कामावर हजर झाले. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत करण्यावर एसटीचा भर असून काल पासून लांब आणि मध्यम पल्ल्याच्या ९० फेऱ्या सुरू झाल्या. आतापर्यंत रत्नागिरी एसटी विभागातून ७०० फेऱ्या सुरू आहेत. २२ एप्रिलनंतर एसटी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे आणि अचानक सुरु केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे त्याप्रमाणे सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. ग्रामीण भागामध्ये तर वाहतुकीसाठी साधनच उपलब्ध नसल्याने प्रचंड नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी आगार वगळता अन्य सातही आगारातून वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. यामुळे जिल्ह्यात आज बर्यापैकी फेऱ्या सोडण्यात आल्या. गावात लालपरी पोचल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. कर्मचारी हळूहळू कामावर रुजू होत असुन, यामध्ये चालक, वाहकांची हजार होण्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे उद्या-परवापासून एसटी हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लांजा, गुहागर, दापोली, चिपळूण आदी आगारांतून आज गाड्याच्या फेऱ्या सोडण्यात आल्या. देवरूख आगारात काही कर्मचाऱ्यांमध्ये कामावर हजर होण्याबाबत वेगवेगळी मते पाहायला मिळाली आहेत. परंतु काल अनेक कर्मचारी देवरूखमध्ये हजर झाले होते आणि वाहतूकही सुरू करण्यात आली होती.
दरम्यान, कोल्हापूर, सातारा, सांगली, येथील बहुतांशी आगार चालू झाल्यामुळे रत्नागिरीत नोकरी करणारे एसटी कर्मचारी पुन्हा रत्नागिरीत कामावर हजर होण्याची शक्यता आहे. यामुळे रविवार, सोमवारपासून अधिक कर्मचारी कामावर हजर होतील आणि एसटीच्या १००% फेऱ्या सोडण्यात यश येईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.