कोकण हे सर्वांसाठीच आकर्षण आहे. सलग आलेल्या चार दिवसाच्या सुट्टीमुळे अनेक जणांनी कोकणाकडे वाट धरली. दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील किनार्यांवर पर्यटकांची गर्दी तिन्ही दिवस दिसत होती. कोकणचे समुद्र किनारे कायमच पर्यटकांना खुणावत असतात. मुलांच्या देखील शाळा, कॉलेजच्या परीक्षा संपून उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्याने अनेक समुद्राचा आस्वाद घ्यायला सहकुटुंब, मित्र मैत्रिणीसोबत, ग्रुपने कोकणात फिरण्यासाठी दाखल झालेत.
कोकणातील किनारे सलगच्या जोडून आलेल्या सुट्ट्यांनी पर्यटकांनी फुलले होते. गणपतीपुळेत रोज २१ हजार याप्रमाणे चार दिवसात ७० हजारांहून अधिक पर्यटकांनी गणपती मंदिरात जावून दर्शन घेतले. जिल्ह्यातील सर्वच किनारी भागात पर्यटकांचा राबता होता. त्यामुळे सुटीचे दिवस व्यावसायिकांना सुगीचे ठरले.
गुरूवार पासून शासकीय सुट्ट्यांना प्रारंभ झाला. सलग सुट्या आल्याने मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो पर्यटक कोकणातील किनार्यांकडे वळले होते. आज मंगळवारी कोरोना काळानंतर येणारी हि पहिली अंगारकी असून, गणपतीपुळे येथे विविध भागातून अनेक पर्यटक दुचाकी, चारचाकी आणि मोठी वाहने घेऊन दाखल झाले. रत्नागिरीतील स्थानिक प्रशासनाने देखील पर्यटकांसाठी उत्तमोत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
वाहनांच्या पार्किंगसह, सर्व चोख बंदोबस्त पोलीस यंत्रणेमार्फत ठेवण्यात आला होता. त्याप्रमाणेच गाड्या नादुरुस्त झाल्या तर ठराविक अंतरावर त्यांचे दुरुस्तीचे सेंटर देखील उभारण्यात आले होते. समुद्र किनाऱ्याचा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अंदाज नसतो त्यामुळे तेथे देखील जीवरक्षकांची नेमणूक शासन आणि एमटीडीसी मार्फत करण्यात आली होती. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये आणि पर्यटकांचा ओघ कायम रत्नागिरीकडे रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जोमाने तयारी केली होती.