रत्नागिरीतील भाट्ये येथील समुद्र किनारी असलेले रत्नसागर बीच रिसोर्ट सील केल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहे. भाट्ये येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रत्नसागर बीच रिसोर्टचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रतापसिंह सावंत यांनी सांगितले कि, महसूल विभाग आणि एमटीडीसी मध्ये झालेल्या वादामुळे महसूल विभागाने रिसोर्ट सील केले आहे.
महसूल विभागाकडून ही जागा ३० वर्षाच्या कराराने १ रुपया भाड्याने एमटीडीसीने घेतली होती. आणि एमटीडीसीने ही जागा रत्नसागर बीच रिसोर्टला १०-१० वर्षाच्या कराराने दरमहा दीड लाख रुपये भाड्याने दिली असून, एमटीडीसीसोबत २०२८ सालापर्यंत करार केला गेलेला आहे. परंतु, महसूल विभाग आणि एमटीडीसी मध्ये झालेला करार संपल्याने फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही लेखी नोटीस न देता मुख्य दरवाज्याला सील केले आहे. त्यामुळे रिसोर्टचे उत्पन्न पूर्णतः बंद झाले आहे.
सदर रत्नसागर बीच रिसोर्ट रिसोर्टच्या परिसर सुशोभीकरण आणि नुतनीकरणासाठी एकूण ११ कोटी रुपये दरम्यान खर्च करण्यात आला आहे. आणि महसूल विभागाने फेब्रुवारीपासून रिसोर्टला सील केल्याने केला गेलेला खर्च वाया जाण्याची शक्यता दिसून येत आहे. त्या दोन्ही विभागाच्या वादाचा फटका आम्ही का सहन करायचा? रिसोर्टच्या होत असलेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई कोण करणार? कधीपर्यंत हा असा अन्याय सहन करायचा! असा सरळ प्रश्न प्रतापसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
या संदर्भात न्यायासाठी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांचीही भेट घेऊन सदर व्यथा कथन करून महसूल विभागाच्या मनमानी कारभाराबद्दल संबंधित प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.