बऱ्याच वर्षापासून, राजापूर मध्ये सुरु होणार्या रिफायनरी प्रकल्पावरून कायम वादंग पेटलेले आहे. सध्या रिफायनरी प्रकल्पाच्या जागेवरून वाद सुरु झाले आहेत. राजापूर नगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ११ विरुद्ध ५ असा ठराव मंजूर झालेला, पण त्यामध्येही नंतर विविध प्रकारचे राजकारण झालेले समोर आले.
सध्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबद्दल सोलगाव-बारसू येथे जागा उपलब्ध असून तिथे प्रकल्प उभारावा अशी मागणी केली जात आहे, परंतु परिसरातील ग्रामस्थांची त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहे. त्यानंतर आत्ता रिफायनरी प्रकल्प कोकणात राहणार की विदर्भात जाणार या विषयावरून जोरदार उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
पण औद्योगिकदृष्ट्या मागासलेला राजापूर तालुका या रिफायनरी प्रकल्पामुळे नक्कीच विकसित होईल, आणि ज्या परिसरामध्ये हा प्रकल्प होणार आहे, त्या परिसरातील स्थानिक सुशिक्षीतांना रोजगार सुद्धा मिळण्याची शक्यता आहे, निव्वळ गावालाच नाही तर त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यालाही होणार आहे. त्यामुळे असा विचार करून अनेक क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायती रिफायनरीच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत आणि शासनाच्या विविध पुरस्कारांवर यशाची मोहोर उमटवलेली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचल ग्रामपंचायतीने रिफायनरी प्रकल्प उभारणीच्या समर्थनाचा एकमुखी ठराव मंजूर करून या तालुक्यातच हा प्रकल्प व्हावा, अशी मागणी केली आहे. रिफायनरी प्रकल्प समर्थनाचा ठराव उपसरपंच किशोर नारकर यांनी मांडला आणि त्याला अनुमोदन ज्येष्ठ सदस्य शंकर ऊर्फ आण्णा पाथरे यांनी दिले. सरपंच अपेक्षा मासये यांच्या अध्यक्षतेखाली पाचल ग्रामपंचायतीची मासिक सभा झाली. त्यामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणीचा एकमुखी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.