रत्नागिरीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव खूपच भयंकर जाणवत आहे. त्यामध्ये येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंबंधी एक प्रकारची भीती सर्वांच्या मनामध्ये थोडी फार तरी आहे. तिसऱ्या लाटेचा जास्तीत जास्त प्रभाव लहान मुलांवर होणार असल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. प्रशासन सुद्धा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाले आहे. परंतु या लाटेसाठी लहान मुलांची नक्की कशी आणि काय पूर्वकाळजी घ्यावी याबद्दल रत्नागिरीतील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. निलेश शिंदे यांच्याकडून जाणून घेऊया.
डॉक्टर दिनाच्या निमित्ताने मुलांनी आणि मुलांच्या पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे यावर अगदी सहज सोप्या पद्धतीने माहिती डॉक्टरांनी दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लहान मुलांवर जास्त प्रमाणात होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. मागील दीड वर्षापासून आपण कोरोनाशी दोन हाथ करतोच आहे, त्यामुळे थोडी काळजी, मुलांचे आवश्यक लसीकरण, उत्तम आणि योग्य आहार, नियमित व्यायाम याकडे पालकांनी लक्ष पुरविले असता आजाराची गंभीर लागण मुलांना होणार नाही असे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. निलेश शिंदे यांनी सांगितले आहे.
डॉ. निलेश शिंदे पुढे सांगताना म्हणाले कि, मुले हि मुळातच योद्धा असतात. त्यांच्यामध्ये असणारी एनर्जी आणि प्रतिकारशक्ती ही मोठ्यांपेक्षाही प्रभावशाली असते. तसेच योग्य त्या वयामध्ये त्यांचे आवश्यक लसीकरण झाले असल्याने, कोरोनाची गंभीर लागण होण्याचा धोका मुलांना कमी संभवतो. तरीही या आजाराचा सामना करण्यासाठी मुलांना मानसिक आणि शारीरिक तयार करायचे असेल तर सुरुवात त्यांच्या खाण्यापासूनच्या सवयीपासून करण्यात यावी. प्रथम मुलांच्या हाय प्रोटीन डाएट कडे लक्ष दिले पाहिजे. त्यामध्ये मांसाहार करणाऱ्या मुलांसाठी अंडी, मासे, चिकन तर शाकाहारी जेवण जेवणाऱ्या मुलांसाठी पनीर, सोयाबीन, डाळी, सुका मेवा असे हाय प्रोटीनयुक्त खाणे देणे आवश्यक आहे. शक्यतो बाहेरील जंक फूड खाणे या काळामध्ये टाळलेलच योग्य ठरेल. आहाराच्या जोडीला चांगली शांत झोप आणि भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. याशिवाय अजून पर्यंत आपण जे कोविड निर्बंध पाळले तेच मुलांनी सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणेही बंधनकारक आहे, तसेच काही धोका जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावे असे सांगितले.