कोकण हा कृषिप्रधान विभाग आहे. विविध प्रकारची शेती, फळे, औषधी वनस्पती यांचे उत्पादन येथे घेतले जाते. आंबा, काजू सारख्या फळांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कोकणात घेतले जाते. सध्या विविध प्रकारच्या बियाण्यांची शेती करण्याचे तंत्र अवलंबले जात आहे. आपला कोकण आणि त्याची असलेली सुपीकता लक्षात घेऊन त्याचप्रमाणे कृषी दिनाचे औचित्य साधून एक कुटुंबाने एक अनोखी प्रथा निभावून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
रत्नागिरी मधील सत्कोंडी या गावी वास्तव्यास असलेल्या रत्नागिरी ह्युमन राईट संस्थेचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरूण मोर्ये यांच्या मातोश्री कै. प्रतिभा तुकाराम मोर्ये यांचे दि. २०/०६/२०२१ रोजी उपचारा दरम्यान आकस्मिक निधन झाले. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने मयत व्यक्तीचे कार्य सुद्धा ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचे शासनाचे आदेश आहेत. कै. प्रतिभा तुकाराम मोर्ये या आदर्श महिला मंडळ सत्कोंडीच्या अध्यक्षा व ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीच्या माजी सदस्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
घरातीळ एखाद्या व्यक्तीचे अचानक निधन झाले तर ती परीस्थिती सर्वांसाठीच नाजूक असते. कै. प्रतिभा तुकाराम मोर्ये यांच्या मुलांनी त्यांच्या आईचे बारावं श्राद्ध विधी कृषीदिनाचं औचित्य साधून गावातील सर्व कुटुंबांना व नातेवाईकांना वेंगुर्ला-४ काजूचे एक रोप देऊन अनोख्या पद्धतीने संपन्न केले. कोवीड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर घरगुती स्वरूपात हे कार्य करून इतर वस्तू देण्याऐवजी, गावातील प्रत्येक कुटूंबाला व नातेवाईकांना प्रत्येकी एक वेंगुर्ला-४ काजूचे रोप देऊन एक नवा सामाजिक आदर्श ठेवला आहे.