मुंबईकर चाकरमान्यांना परतीचे वेध लागले असून, सर्वसामान्यांची गाडी म्हणून ओळखली जात असलेल्या एसटीसह खासगी गाड्यांना त्याचा चांगलाच फायदा होत आहे. एसटीच्या तुलनेमध्ये काही खासगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट आकारणी केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट सुरू आहे. मे महिन्यांमध्ये शाळांना असलेली सुटी, लग्नाचे मोठ्या प्रमाणात असलेले मुहूर्त आणि कोकणातील रानमेव्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमनी कोकणामध्ये दाखल होतात. त्याप्रमाणे यावर्षीही मुंबईकर चाकरमनी कोकणामध्ये आले आहेत. लग्नसराईसह मे महिन्याचा हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आला आहे.
दहावी, बारावीच्या निकालाबरोबर मुलांच्या शाळा, कॉलेज सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबईकर चाकरमन्यांना परतीचे वेध लागले आहेत. परतीचा प्रवास सुखर व्हावा यासाठी एसटीसह खासगी वाहनांचे बुकिंग करण्याच्या हलचालींना वेग आला आहे. येथील एसटी आगारानेही नियोजनबद्द व्यवस्था केली आहे. तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी आगारासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी आरक्षण केंद्रेही सुरू केली आहेत. चाकमान्यांकडून परतीच्या प्रवाशासाठी एसटीपेक्षा खासगी गाड्यांना अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे एसटी आगाराच्या बाहेर विविध कंपन्यांच्या मोठ्या संख्येने मुंबईला जाणाऱ्या खासगी बसेसची गर्दी होते आहे. त्यामुळे या परिसरामध्ये जत्रा भरल्याचे चित्र दिसत आहे.
काही खासगी बसेसधारकांकडून मुंबईला जाण्यासाठी तब्बल आठशे रुपयांपासून थेट एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत तिकीट आकारले जात आहे. पण, वेळेत घरी पोहचायचे. असल्याने अव्वाच्या सव्वा प्रवासी भाडे काही चाकरमान्यांकडून दिले जात आहे. पण, काही चाकरमान्यांकडून या प्रवासी भाड्याबद्दल कुरकूर केली जाते.. पण, तक्रार कशी व कोणाकडे करायची, केली तर आपणच कशाला वाईटपणा घ्यायचा म्हणून अनेक चाकरमानी तोंडाला कुलूप लावून खासगी प्रवासी वाहतूकदारांची मनमानी सहन करीत आहे.