गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या विशेषतः खासगी बसेसची तपासणी नियमितपणे आरटीओ अधिकाऱ्यांकडून महामार्गावर सुरु आहे. त्याप्रमाणे मद्यप्राशन करुन वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई हाती घेतली आहे. पहिल्या दोन दिवसांत १८ खासगी बसेसवर कारवाई करून १ लाख ३० हजारांचा दंड आरटीओकडून वसूल करण्यात आला. त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी आरटीओ विभागाकडून देण्यात आली. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात हजारो चाकरमानी मुंबई, पुण्यातून दाखल होत असतात.
रेल्वे, खासगी वाहने, एसटी, खासगी बसेसने हे चाकरमानी सोमवारी संध्याकाळपर्यंत दाखल झाले आहेत. तर गौरी-गणपतीच्या सणाला अजूनही काही चाकरमानी येत आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव काळात विशेषतः खासगी बसेसधारकांकडून जादा तिकीटदर आकारले जात असल्याच्या तक्रारी आरटीओ कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. आरटीओ विभागाने खासगी बसेसचे तिकीटदर निश्चित करून दिले असून, त्यापेक्षा अधिक तिकीट दर वाढीबाबत कोणतीच तक्रार या कारवाईत नव्हती. खासगी बसेसची तपासणी करण्यात आली त्यामध्ये वाहन नियमबाह्य काही त्रुटी आढळल्याने या कारवाईत १८ खासगी बसेसवर १ लाख ३० हजार दंडात्म कारवाई करण्यात आली आहे.
तसेच वेगमर्यादा ओलांडण्यांवरही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात पोलिस विभागाबरोबरच आरटीओ विभागही २४ तास गस्त पथकात काम करत आहे. ही तपासणी मोहीम गणेशोत्सव संपेपर्यंत २४ तास राबविण्यात येणार आहे.