काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या तीन पक्षांसह समविचारी पक्षांच्या महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने काम केले. विधानसभा निवडणुकीतही मित्रपक्षांनी आघाडी धर्म पाळला, असे असताना कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, जिल्हात कॉंग्रेस पक्षाला विधानसभेच्या एकुण १२ जागा मिळाव्यात, नाहीत्र सांगली पॅटर्न राबविण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती कमिटीचे उपाध्यक्ष व कोकण विभाग प्रभारी सुनिलभाऊ सावर्डेकर यांनी विधान केले आहे.
ज्या हुकूमशाही पद्धतीने राज्यकर्त्यांचे काम चालू आहे, ते मांडण्याचे काम महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, नेत्यांनी केल्याने त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना झाला. परंतु, काही दिवसांपासून कोकणात आघाडीचे काही पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी आपआपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत असून काँग्रेसला गृहीत धरत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार आघाडीचे अधिकृत उमेदवार घोषित झाले असे सांगितले जात आहे. त्यामुळे आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. आघाडीचा धर्म पाळायचा नसेल तर काँग्रेसही मैत्रीपूर्ण लढतीसाठी सज्ज आहे, असा इशारा सुनिलभाऊ सावर्डेकर यांनी दिला आहे.