27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRajapurअर्जुना धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न, गेट बंद असताना वाहने आत जातात कशी?

अर्जुना धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न, गेट बंद असताना वाहने आत जातात कशी?

तालुक्यातील करक येथील अर्जुना धरणात चारचाकी वाहन कोसळून झालेल्या अपघातात दोन कामगारांना जीव गमवावा लागला; तर आठजण जखमी झाले. या घटनेने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणाकडे जाणारे गेट बंद ठेवण्यात आलेले असताना त्या धरण क्षेत्रात वाहने जातात कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अपघातातील काही जखमींची प्रकृती अद्यापही गंभीर असून, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही कामगारांचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह बिहारला रवाना झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अर्जुना धरण प्रकल्पांतर्गत लांजा तालुक्यातील आरगांव येथे सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावरील १० कामगार काल (ता. १४) सायंकाळी उशिरा अर्जुना धरणावर फिरण्यासाठी गेले होते.

अर्जुना धरणाकडे जाणारा मार्ग यापूर्वीच वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेला असल्याने धरण पाहण्यासाठी येणारे पर्यटक तेथे आपली वाहने घेऊन जाऊ शकत नाहीत. माघारी फिरत असताना त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडी धरणात कोसळली होती. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असावा आणि उर्वरित जखमी झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन हे धरणाच्या पहिल्या टप्प्यावरच अडकून थांबल्याने व आतील कामगार बाहेर फेकले गेल्याने वाहनासह सर्व कामगार खाली पाण्यात पडले नाहीत अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सर्व जखमींसह दोन मृत कामगारांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील चार गंभीर जखमी कामगारांना काल रात्री कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात अधिक उपचारार्थ हलवण्यात आले होते तर चौघांची स्थिती धोक्याबाहेर असल्याने रायपाटण ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आठ कामगार हे युपी, बिहारमधील असून, ते एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. लांजा तालुक्यातील आरगाव येथे धरणाच्या पाईपलाईनच्या कामासाठी ते सर्वजण एकत्र राहात होते अशीही माहिती मिळाली, तर दोन कामगार सांगली परिसरातील होते. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनचालक राहुल गणेशवाडे यांच्याविरुद्ध राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमींमध्ये त्याचादेखील समावेश असून, तो उपचार घेत आहे. दरम्यान, मृतांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन होऊन पार्थिव बिहारला रवाना झाले आहेत. धरणक्षेत्राकडील मार्ग बंदिस्त ठेवा, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular