रत्नागिरी शहर वाहतुकीच्या बसेस शहरासह ग्रामीण भागात प्रवास करतात. ग्रामीण भागातून अनेक ज्येष्ठ नागरिक कामानिमित्त शहरात येत असतात; मात्र शहर वाहतुकीच्या बसेसची पहिली पायरी रस्त्यापासून जास्त उंचावर असल्याने ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढणे अशक्य होते. एसटी बसेसना रस्त्यापासून कमी उंचीवर अतिरिक्त पायरी बसवण्यात यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
रत्नागिरी एसटी विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या शहर वाहतुकीच्या एसटी बसला पायऱ्या रस्त्यापासून अधिक उंचीवर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढणे अशक्य होते. त्यामुळे त्यांना आधार घ्यावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बसेसना अतिरिक्त पायरी लावण्याची मागणी युवासेनेने केली आहे. शुक्रवारी तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत यांनी याबाबतचे लेखी निवेदन एसटी अधिकाऱ्यांना दिले आहे.
शुक्रवारी एसटीच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले. या वेळी तालुका युवा अधिकारी प्रसाद सावंत, आशिष चव्हाण, दुर्गेश साळवी, निखिल बने आदी उपस्थित होते. रस्त्याची उंची आणि एसटीच्या शेवटच्या पायरीची उंची गाठताना महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना कसरतच करावी लागते आहे. अनेक वेळा असा प्रयत्न करत असताना तोल जाऊन पडण्याच्या सुद्धा घटना घडतात.
अशा प्रकारचे अपघात घडू नये यासाठी खबरदारी म्हणून युवासेनेच्या माध्यमातून एसटी आगारातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्याने जेष्ठ नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जेष्ठांना उद्भवणाऱ्या समस्यांवर भावी युवा पिढी आवर्जून लक्ष घालत असल्याने एक प्रकारे भक्कम आधार निर्माण झाल्याची भावना जेष्ठ पिढीकडून व्यक्त केली जात आहे.