राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीतील कन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये झालेल्या १६ पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यात आली. मात्र, शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत नकार दिल्यामुळे, पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. तेंव्हा बोलताना शरद पवार म्हणाले कि, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी माझं नाव सुचवल. त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव मी नम्रपणे नाकारला,’ असं पवारांनी ट्विट केलं आहे. सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सेवा देण्याचं माझं काम सुरूच राहील, असं पवारांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
तृणमूल काँग्रेच्या वतीने महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांना उमेदवारी मिळण्यासाठी नावे सुचवण्यात आली आहेत. याशिवाय, गुलाम नबी आझाद आणि यशवंत सिन्हा यांचेही नाव काही प्रमाणात चर्चेत आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून निकाल २१ जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. २९ जून हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे.
केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. शिवसेनेचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह आहे. परंतु, पवार यांनी नकार दिल्यास, राजकीय परिघाबाहेरील सर्वमान्य उमेदवार निवडावा, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.
भाजपा विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी ही सुरुवात केली. केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे, तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहीजे, असे देसाई पुढे म्हणाले.