छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनमधून महाराष्ट्रात आणून जनतेला दाखविण्याचा यापूर्वी कधीच प्रयत्न झाला नव्हता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मला लंडनमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हे माझे परमभाग्य आहे, अशी प्रतिक्रिया लंडन दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (ता. ३) रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्यदैवत आहेत. त्यांचे नाव घेऊन अनेकांनी राजकारण केले.
मला प्रामाणिकपणे नमूद केले पाहिजे की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावामुळे अनेकांना राग आला. परंतु त्या उठावाचे समर्थन केले नसते तर मी राज्याचा उद्योगमंत्री बनलो नसतो. काम करण्याची संधी मला सरकारमध्ये मिळाली नसती. हा सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम असताना उद्योगमंत्र्याला त्यामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. येत्या काही दिवसांत ही वाघनखं महाराष्ट्रामध्ये येऊन जनतेला बघायला मिळणार आहेत. मी जेव्हा त्या वाघनखांच्या जवळ होतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून अंगावर रोमांच उभे राहिले होते.
वाघनख्याबाबत अभिमान – या वाघनख्याबाबत काही लोकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेले वाघनखं असा उल्लेख तेथे आहे. त्यांची आठवण म्हणून ही वाघनखे त्या म्युझियममध्ये आहेत. याचा अभ सगळ्यांनाच आहे, असेही सामंत यांनी अभिमानाने सांगितले.