लांजा-कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पासाठीची जमीन आचारसंहिता काळात कशी खरेदी करण्यात आली ? निवडणूक आयोगाची परवानगी न घेता साडेसहा कोटींचा व्यवहार कसा करण्यात आला ? तसेच या खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती जिल्हा प्रशासनाला नव्हती का ? असे अनेक प्रश्न माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित केले. याप्रकरणी बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राऊत यांनी केली. लांजा नगरपंचायतीच्या प्रस्तावित घनकचरा प्रकल्पासाठी कोत्रेवाडी येथील जमीन खरेदी व्यवहार चांगलाच चर्चेचा आला आहे. गेले ४० दिवस याप्रकरणी ग्रामस्थांनी सुरू ठेवलेल्या बेमुदत उपोषणासंदर्भात उबाठा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी आणि याप्रकरणातील संबंधित अधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्यासोबत आज बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, लांजा नगरपालिकेचे अधिकारी तुषार बाबर आणि कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी बैठकीला उबाठाचे उपनेते सुरेंद्र उर्फ बाळ माने, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ता कदम तसेच लांजा – कोत्रेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. लांजा नगरपालिकेने २०२० मध्ये घनकचरा प्रकल्पासाठी कोत्रेवाडी येथील १० एकर जागा प्रस्तावित केली होती; मात्र, तत्कालीन नगरपंचायत सदस्यांनी या जागेसाठी विरोध केला. हा प्रकल्प २०१६ च्या निकषांत बसत नसल्याने नियोजित जागा रद्द करण्यात येत असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून २२ मार्च २०२१ ला कळवण्यात आले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान १० मे २०२४ मध्ये संबंधित जागेचे खरेदीखत करून ही जागा नगरपंचायत प्रशासनाने आपल्या नावावर करून घेतली. जागामालक यांच्या नावाचे संमतिपत्र सादर करून ६ कोटी ३६ लाखांचे खरेदीखत करण्यात आले असल्याचे यावेळी खासदार राऊत यांनी सांगितले; मात्र आचारसंहिता काळ सुरू असताना निवडणूक आयोगाची परवानगी न घेता हा व्यवहार कसा झाला ? तसेच संबंधित जमिनीसाठी कोणताही रस्ता नसताना आणि या परिसरात जीवन प्राधिकरणाची पिण्याच्या पाण्याची विहीर असताना या ठिकाणी घनकचरा प्रकल्पासाठी परवानगी कुणी दिली? याबाबत आजच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
बेमुदत उपोषण थांबवा – याची माहिती घेऊन या प्रकरणाची माहिती तत्काळ वरिष्ठस्तरावर देण्यात येईल. या जागेवर सध्या कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यात येऊ नये, अशा सूचनाही नगरपंचायतीला देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी आपले बेमुदत उपोषण थांबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी यावेळी केले.

