27 C
Ratnagiri
Sunday, October 27, 2024
HomeRatnagiriवंदे भारत ट्रेन आता एक दिवस आड; पावसाचा फटका!

वंदे भारत ट्रेन आता एक दिवस आड; पावसाचा फटका!

पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावणार आहे.

मुंबई-गोवा दरम्यानच्या जलद प्रवासासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्यात येत आहेत. परंतु, पावसाळ्यात मुंबई- गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या अप आणि डाऊन १२४ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. पावसाळ्यात या मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने आपत्कालीन घटना होऊ नये यासाठी रेल्वेगाड्यांचा वेग कमी केला जातो. त्यामुळे बहुतांश रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येतो. याचा सर्वाधिक फटका अति जलद रेल्वेगाड्यांना बसतो. यात वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे.

आठवड्यातून सहा वेळा धावणारी वंदे भारत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त तीन दिवस धावणार आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच पावसाळ्यात मुंबई-गोवा दरम्यानचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक वंदे भारतमधून प्रवास करणे पसंत करतात. मात्र, जून-ऑक्टोबर कालावधीत मुंबई-गोवा वंदे भारतच्या १२४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून यादरम्यान प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणे अवघड होणार आहे. पावसाळी वेळापत्रक लागू केल्याने काही रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.

यात वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. सकाळी सीएसएमटीवरून वंदे भारत एक्स्प्रेसचा एक रेक दुपारी मडगावला पोहचतो. त्यानंतर हाच रेक सीएसएमटीला पाठविण्यात येतो. मात्र, पावसाळ्यात रेल्वे गाड्यांचा वेग कमी झाल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक टर्मिनसवर वेळेत पोहचत नाही. त्यामुळे परतीचा प्रवास करताना दुसऱ्या डब्याची आवश्यकता आहे. परंतु, रेक नसल्याने वंदे भारत आठवड्यातून तीन वेळा चालवण्यात येणार आहे. यासह जादा रेक उभा करण्यासाठी सीएसएमटी येथे जागेचा अभाव आहे, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular