जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींमध्ये ६७ सरपंच, तर ११०० सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. उमेदवार निश्चित झाल्यामुळे प्रचाराला सुरवात झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून चिन्ह वाटप झाल्यानंतर आता प्रचाराला रंगत येऊ लागली आहे. आमदार, खासदार, मंत्रीही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामस्थ व पदाधिकार्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना करत आहेत. दापोली-खेडमध्ये भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्यात युती झाली आहे, तर रत्नागिरीत काही जागांवर समन्वय साधून निवडणूक लढवली जात आहे. या निवडणुकीत वर्चस्व ठाकरे सेनेचे की शिंदे सेनेचे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांसह १७६६ सदस्यपदासाठी निवडणूक घोषित झाली होती. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जिल्ह्यात ६७ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले असून उर्वरित १५५ सरपंचपदासाठी ४०६ उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी महाविकास आघाडी, बाळासाहेबांची शिवसेना व भाजप असे युती व आघाडी करून लढत आहेत, तर काही ठिकाणी तिघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. जिल्ह्यात मंडणगड- १, दापोली- ९, खेड- २, चिपळूण- १३, गुहागर- ९, संगमेश्वर- १६, रत्नागिरी- ६, लांजा- २ व राजापूर- ९ सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत.
ग्रामपंचायतीमध्ये १७६६ सदस्य असून त्यातील ११०० सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरित ६६६ सदस्यपदांसाठीही १२०६ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे. जिल्ह्यात मंडणगड- ३३, दापोली- १८४, खेड- ५२, चिपळूण- १८१, गुहागर-११५, संगमेश्वर-१६७, रत्नागिरी- १३४, लांजा- ९९ व राजापूर- १३५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.