जिल्ह्यामध्ये अनेक गुरं विना मालक मोकळी फिरताना दिसतात. गाई बैलांसोबत त्यांची वासरे, पाडे देखील अख्खा रस्ता अडवून बसलेली दिसतात. अनेकदा अपघाता सारख्या घटना देखील घडतात. नगर पालिकेमार्फत त्यांना कोंडवाड्यात देखील पाठवण्यात येते. परंतु, दिवसेंदिवस या गुरांची संख्या वाढतच चालली आहे. लांज्यामध्ये देखील अशा गुरांना एका गाडीत टाकून नेताना पकडण्यात आले आहे.
भांबेड ग्रामस्थांनी विनापरवाना गुरांची वाहतूक करणाऱ्या पाचजणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रविवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या दरम्यान घटना भांबेड ते वाटूळ रोडवर भांबेड पवारवाडी या ठिकाणी घडली. याप्रकरणी पोलिसांना बोलेरो पिकअप चारचाकी गाडीमध्ये तीन गाई आणि तीन वासरे सापडली. पोलिसांनी एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोमवारी ११ एप्रिल रोजी विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी पाचही जणांवर गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक ग्रामस्थांना भांबेड ते वाटुळ या मार्गावर गुरांची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार भांबेड येथील ग्रामस्थांनी रविवारी १० एप्रिल रोजी रात्री भांबेड पवारवाडी या ठिकाणी जागता पहारा ठेवला होता. रात्री १०.०० वाजता एम.एच.०७ एजे ७८६६ या नंबरची बोलेरो मॅक्स पिकअप चार चाकी गाडी तेथे आली असता ग्रामस्थांनी ती थांबवली आणि या गाडीच्या पाठीमागील हौद्यामध्ये दाटीवाटीने उभी करून बांधून ठेवलेली गुरे आढळून आली. ग्रामस्थांनी गाडी चालकाला याबाबतचा जाब विचारला असता त्यांना समर्पक उत्तर देता आली नाहीत. म्हणून ग्रामस्थांनी या सर्वांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.