देशाचा अभिमान युवावर्ग आहे. त्यामुळे युवकांनी आता विचारांनी पेटून उठले पाहिजे आणि तुमच्यामुळेच लोकसभेची ही निवडणूक सोपी होणार आहे. कालच्या सभेत ठाकरेंना हार घालणारे होते. त्यापैकी निम्मे लोक नारायण राणे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट महायुतीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. शहरातील जयेश मंगल पार्कमध्ये आयोजित महायुतीच्या युवा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, राजेश सावंत, बिपिन बंदरकर आदी, उपस्थित होते.
सामंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आठ दिवसच शिल्लक आहेत. ते महत्त्वाचे आहेत. शहर, वाडी-वस्ती ठिकाणी जाऊन लोकांना मतदान करायला लावले पाहिजे. प्रत्येकाने १०० जणांना मतदानासाठी आणावे आणि कमळावर मतदान करण्यासाठी आवाहन करावे. जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा आमची अशीच खिल्ली उडवली होती. क्रिकेट खेळणारे हे काय आमदार होणार; परंतु तेव्हा आमच्याकडे मजबूत युवकांची फळी होती. त्या जोरावर मी आमदार झालो. त्यामुळे युवकांनी माहोल तयार केला पाहिजे.
आपली नाळ थेट लोकांशी जुळली पाहिजे. स्टरलाईची ७०० एकर जागा परत एमआयडीसीकडे आली. त्या जागेपैकी काही जागेत डिफेन्स क्लस्टर प्रकल्प होणार आहे. त्यातूनही रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याबाहेर गेलेला गुंडाईचा प्रकल्प पुन्हा आणण्याच आम्हाला यश आले. १२ हजार कोटींची गुंतवणूक करून पुण्यात हा प्रकल्प येतो.