मागील दोन ते अडीच वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीमुळे थांबले होते. कोरोनाच्या तीन लाटा येऊन संपूर्ण हाहाकार उडवून गेल्या. अनेकांची जवळची लांबची माणसे या महामारीमध्ये गेली. आत्ता कुठेसा कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने राज्याची निर्बंधातून मुक्तता करण्यात आली. परंतु, देशात पुन्हा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली मध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे वृत्त धडकल्याने आजूबाजूच्या राज्यांना सुद्धा सुरक्षिततेच्या कारणास्तव अलर्ट करण्यात आले आहे.
देशातून कोरोनाचा संसर्ग कमी झालाय असं वाटत असतानाच एका धक्कादायक बातमीने सर्वांना घाम फुटला आहे. दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी २४ तासात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यातही दिवसभरात १६२ नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाकडून स्वसंरक्षणासाठी तरी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत आलेल्या तीनही लाटांमध्ये सर्वाधिक रूग्णसंख्या दिसून आली होती आणि मृत्यूदर देखील अधिक होता. त्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झालं आहे. पुढील आठवड्यात महत्वाची बैठक बोलाण्यात आली असून, या बैठकीत मास्कबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय संभाव्य चौथ्या लाटेचा धोका विचारात घेता राज्यात पुन्हा निर्बंध लागू होऊ शकण्याची शक्यता आहे.
दिल्लीत बुधवारी कोरोना रूग्णांची संख्या ६०० होती. तर गुरूवारी म्हणजेच अवघ्या २४ तासांत हीच रूग्णसंख्या दुप्पट झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची सुरूवातही साधारण अशीच होती. त्यामुळे आताच काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे म्हणणं आहे.