घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या उपवासमुळे दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात मासळीचा उठाव कमी झाला आहे. परिणामी माशांचे दर निम्म्याने घसरले आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरमईला असलेला ७०० रुपये किलोचा दर शनिवारी मात्र ३५० रुपयांपर्यंत घसरला होता. दापोली तालुका पर्यटन हब बनत असून स्वच्छ व समुद्र किनारे आणि ताजी मासळी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते. दापोलीत येणारे बहुतेक पर्यटक हर्णे बंदरात मासळी लिलाव पाहणे आणि खरेदीसाठी येत असतात. अर्थात यामध्ये सुरमई, पापलेट आणि मोठी कोळंबी यालाच अधिक पसंती असते. साहजिकच हर्णे बंदरात या मच्छीला चांगला भाव मिळतो. बंदरात दोन किलोपासून ७ ते ८ किलोपर्यंतचे सुरमय नग उपलब्ध होतात.
सरासरी ७०० ते ८०० रुपये किलोचा दर सुरमईला मिळतो. मात्र उपवासाचे वेळी हे दर घसरतात. आता नवरात्रीचे उपवास सुरू झाल्याने याचा परिणाम मच्छीदरांवर झालेला दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी ७०० ते ८०० रुपये किलो असलेला सुरमई दर शनिवारी ३५० पर्यंत घसरला आहे. तर टायनी कोळंबी आणि पापलेटचे दरही बऱ्याच प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र घसरलेल्या दराचा स्थानिक व्यावसायिक व पर्यटकांनी पुरेपूर लाभ उठवल्याचा दिसून येत आहे. सध्या हर्णे बंदरात सुरमई आणि टायनी कोळंबीची आवक वाढली आहे. मात्र अजून ७ ते ८ दिवस दर नरमच राहणार असल्याचे बाजार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.