मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी व रायगड जिल्हा जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगद्यामधील -मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी एक मार्गिका ११ सप्टेंबरपर्यंत हलक्या प्रवासी वाहनांसाठी सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बोगद्यातील वाहतूक नियंत्रणासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून दोन्ही बाजूला वाहतूक पोलिस असणार आहेत. ही एक मार्गिका सुरू झाली, तरी खासगी प्रवासी बस, एसटी या वाहनांची वाहतूक बोगद्यातून होणार नाही. तर त्यांना घाटातूनच प्रवास करावा लागणार आहे. गणेशोत्सवाच्या वाहतूक व्यवस्थापन आढावा बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गुरुवारी घेतली.
या बैठकीत पोलिस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. बोगद्यातील सुरक्षेची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. पोलादपूर तालुक्यातील कशेडी हा अवघड वळणांचा महत्त्वाचा घाट पार करण्यासाठी तब्बल ४५ मिनिटांचा वेळ लागतो. या घाटात अनेकदा जीवघेणे अपघातही होतात. कशेडी बोगद्यातील एक मार्गिका सुरू झाल्यास हा वेळ केवळ दहा- पंधरा मिनिटांवर येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात दहा लाख भक्त दाखल होतील, असा अंदाज जिल्हा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात दहा ठिकाणी पोलिस चौक्या असतील. रत्नागिरी जिल्ह्यात १४ ठिकाणी पोलिस चेकनाके तसेच स्वागत कक्ष व्यवस्था करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटापासून खारेपाटणपर्यंत तसेच आंबा घाट येथे ही व्यवस्था असणार आहे.