लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे हमखास विजयी होतील असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील बहुतांश हॉटेलच्या रुम्स त्यांच्या समर्थकांनी बुक करुन ठेवल्या असल्याचे समजते. मोठ्या संख्येने मुंबईसह सिंधुदुर्गातून राणे समर्थक विजयोत्सवासाठी एक दिवस आधीच रत्नागिरीत येऊन दाखल होणार असल्याचे म्हटले जात आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघातून ना. राणे यांनी विजयाचा दावा केला आहे. वेगवेगळ्या एक्झीट पोलनेही ना. राणे आघाडीवर असल्याचे अंदाज दिले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर राणेंचे समर्थक आता उत्साहात कामाला लागले आहेत. रत्नागिरीत एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. यामुळे मतमोजणीसाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते दाखल होणार आहेत. ना. राणे यांच्या समर्थकांनीही विजयोत्सव साजरा करण्यासाठीच एक दिवस आधीच रत्नागिरीत होण्याची तयारी सुरु केल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर व परिसरातील अनेक आलिशान हॉटेलच्या खोल्या ३ व ४ जून रोजी बूक करण्यात आल्याचे समजते. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातूनच नव्हे तर राणेंचे होमपीच असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने राणेंचे समर्थक रत्नागिरीत दाखल होण्याची शक्यता आहे.