24.1 C
Ratnagiri
Friday, February 20, 2026

पानवल धरणाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात रत्नागिरीकरांना दिलासा

रत्नागिरी शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या आणि नगरपालिकेच्या...

कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा

समुद्राची गाज आणि वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर यामुळे कशेळी...

बावनदी पूल वाहतुकीस खुला एका मार्गिकेवरून प्रवास

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत...
HomeRatnagiriमोकाट गुरांच्या समस्येकडे यंत्रणांची डोळेझाक…

मोकाट गुरांच्या समस्येकडे यंत्रणांची डोळेझाक…

एका संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात सुमारे २५० मोकाट गुरे आहेत.

रत्नागिरी शहरामध्ये मोकाट गुरांचा उपद्रव वाढतच चालला आहे. शहरात कुठे जाल तिथे मोकाट गुरांचे मुख्य रस्ता किंवा आजुबाजूला बस्तान असते. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन अनेक अपघात झाले आहेत; परंतु ही समस्या सोडवणाऱ्या यंत्रणांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याने वाहनधारक आणि शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंपक मैदानावर उभारण्यात आलेली निवारा शेड (कोंडवाडा) हे संस्थांनी आणलेल्या जखमी गुरांचा आसरा बनला आहे; मात्र ज्या मोकाट गुरांसाठी हे शेड आहे ती मोकाट गुरे आजही मोकाटच आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत रत्नागिरीतील नागरिक आणि वाहनधारक एका वेगळ्या समस्येला तोंड देत आहेत.

शहर सुंदर आणि स्मार्ट बनवण्याची धडपड लोकप्रतिनिधी करत असले तरी यंत्रणांची मानसिकता त्यामध्ये खोडा घालताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी मोकाट गुरांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून पैसे देऊन चंपक मैदानावर मोकाट गुरांसाठी निवारा शेड उभारली आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने सुमारे ७३ मोकाट गुरे पकडून ती काही गोशाळा, तर काही शेतकऱ्यांना दिली तरी मोकाट गुरांची संख्या काही कमी होताना दिसत नाही उलट ती वाढतच आहे. येथील एका संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये शहरात सुमारे २५० मोकाट गुरे आहेत.

शहरात घंटागाड्याद्वारे दररोज कचरा गोळा केला जातो तरी काही बेशिस्त नागरिक त्या गाड्यांच्या वेळा न पाळता आपल्या वेळेप्रमाणे घराबाहेर पडून जुन्या कचराकुंड्या किंवा अन्य ठिकाणी कचरा फेकून देतात. त्यामुळे या मोकाट गुरांना ते खाद्य मिळते. परिणामी, शहरात मोकाट गुरांचा ठिय्या वाढतच चालला आहे. मोकाट गुरांना पकडून ३ दिवसांत त्याचे मालक न आल्यास त्यांचा लिलाव करण्याचा अधिकार आहे; परंतु त्यालाही काही संस्था विरोध करत आहेत; परंतु मोकाट गुरे पाळणे हे पालिकेचे कामच नाही. त्यामुळे सध्या शहरातील मोकाट गुरांची समस्या वाढतच चालली आहे. जिल्हा प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी याबाबत गंभीर दखल घेण्याची गरज आहे; परंतु सर्व यंत्रणा सध्या मूग गिळून आहेत.

नवीन भाजी मार्केट बनला अड्डा – शहरातील नवीन भाजी मार्केट गुरांचा कायमचा अड्डा बनला आहे. शिल्लक भाजीपाला किंवा अन्य पालेभाज्या व्यापारी मार्केटच्या मागच्या बाजूला टाकून देतात. तिथेच मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे गोळा होतात. तिथेच खातात आणि आजूबाजूला रस्त्यावर ठाण मांडून बसतात. पालिकेने याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular