कोकणामध्ये आता सगळीकडे हिरवळ दिसायला सुरुवात होईल. सध्या ग्रामीण भागामध्ये शेतीचा हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या तयारीसाठी लगबग सुरु झाली आहे. दरवर्षीच्या अंदाजाप्रमाणे साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून कोकणात दाखल होतो. परंतु यावर्षी केरळमध्येच मान्सून ३ जुन नंतर दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने वर्तविले असल्याने,त्यानंतर आठवडाभराने तो कोकणात दाखला होईल.
मागील वर्षापासून, कोरोना, उद्योग व्यवसाय ठप्प, समुद्रात उठणारी वादळे, कोरोना संसर्गाचा वेग वाढल्यामुळे सर्वत्र केले गेलेले लॉकडाऊन असल्याने, अनेक आर्थिक समस्यांचा सामना करत सुद्धा बळीराजा सकारात्मकतेने विचार करून नव्या जोमाने शेतीच्या कामाला लागला आहे. मान्सूनपूर्व शेतीची पारंपारिक पद्धतीने मशागत करताना तर काही ठिकाणी यांत्रिक अद्ययावत पद्धतीचा अवलंब करून शेतीच्या मशागतीला सुरुवात करण्यात आली आहे तसेच, धूळफेक पेरण्यामध्ये शेतकरी व्यस्त झाले आहेत. राजापूर, जैतापूर परिसरामध्ये अशा प्रकारची मान्सूनपूर्व पेरणी केली जाते. काही शहर नजीकच्या भागांमध्ये कातळ भाग असल्याने अशा भागावर शेतकरी पावसाळा सुरु होण्याच्या आधीच नांगरणी, मशागतीसह धूळफेक पेरण्यांची कामे करताना दिसतात.
शेती संबंधित बी-बियाणे, चांगल्या प्रतीची वाणे, रासायनिक खते खरेदी इत्यादी शेती आवश्यक कामांची पूर्वतयारी करताना शेतकरी दिसत आहे. लॉकडाऊन असल्याने शासनाने ग्रामीण भागातील शेतकर्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बियाणे आणि खतांचा पुरवठा घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनामुळे आलेली नकारात्मकता, नैराश्य बाजूला सारून बळीराजा पुन्हा एकदा नांगर धरायला सज्ज झाला आहे. काही जणांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन शेती हेच असते, त्यामुळे वर्षभरातील ६ महिने कष्ट घ्यायचे आणि ६ महिने कष्टाविना घालवायचे, तेंव्हा इतर फळ भाज्यंची लागवड करून त्यांचे उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो.