कोकण रेल्वे मार्गावरून मडगाववरून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. मडुरा स्टेशन सोडल्यानंतर अचानक मांडवी एक्सप्रेसच्या डब्यातून धुर येवू लागताच प्रवासी हबकले. पाठोपाठ आग लागल्याचेही निदर्शनास येताच प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला. लहान मुलांनी तर भोकाड पसरले. दरम्यान काही वेळातच ही गाडी सावंतवाडी रेल्वेस्थानकात येवून दाखल होताच कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तातडीने आग विझवण्यात यश मिळाले, तेव्हा कुठे घाबरलेल्या या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र तोपर्यंत हजारो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
दैवबलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो अशी प्रतिक्रिया सुटकेचा निश्वास सोडणाऱ्या अनेक प्रवाशांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर या अपघाताविषयी सविस्तर माहिती देताना प्रसारमाध्यम पांच्या प्रतिनिधींना सांगितले. गाडीच्या ब्रेकमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक कयास वर्तविण्यात आला आहे. याविषयी अधिक वृत्त असे की, बुधवारी कोकण रेल्वे मार्गावरुन धावणारी मांडवी एक्स्प्रेस मडगावहून सकाळी नेहमीच्या वेळेत मुंबईच्या दिशेने निघाली. ती मडुरे स्थानकात पोहोचली. तोपर्यंत सर्वकाही ठिकठाक होते. मात्र या स्थानकावरुन सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर गाडीच्या शेवटच्या डब्याखालून धूर येत असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. डब्यातून धूर येत असल्याचे अनेकांच्या लक्षात येताच त्यांचे धाबे दणाणले.
दरम्यान, आग लागल्याचे प्रवाशांच्या जेथे लक्षात आले तिथुन पुढे अवघे अर्धा किलोमीटरवर सावंतवाडी स्टेशन होते. गाडी सावंतवाडी स्थानकात थांबली त्यावेळी डब्याखालून धूर येत होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी येथील अधिकाऱ्यांना या आगीबाबत कल्पना दिली. गाडी थांबताच डब्यातील महिला प्रवाशांनी घाबरुन गाडीतून खाली उतरत प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्नीरोधक वापरुन आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमागचेनेमके कारण समजल नसले तरी ब्रेकमध्ये तांत्रिक कारणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांचा मात्र काहीक्षण थरकाम उडाला होता.