जिल्ह्यातील २ हजार ४४३ बचतगटांच्या सीआरपीएस महिलांना शासकीय नियोजनाच्या लाभाअंतर्गत मोफत मोबाईल देण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटींचा निधी आला असून, १५ दिवसांत मोबाईलचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यात राबवण्यात येत असणाऱ्या विविध योजना, विविध प्रकल्प आणि जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी देण्यात आलेला निधी, त्यावर करण्यात आलेला खर्च आदींबाबतचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकांना आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी एम. डी. बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सुजित वंजारे आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नमो कामगार कल्याण अभियान, नमो शेततळे अभियान, नमो आत्मनिर्भर आणि सौरऊर्जा गाव अभियान, नमो ग्राम सचिवालय अभियान, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, नमो दिव्यांग शक्ती अभियान, नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान, नमो शहर सौंदर्यीकरण अभियान, नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संरक्षण अभियान, नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानांचा आढावाही पालकमंत्री सामंत यांनी घेतला. १३ कलमी फ्लॅगशिप कार्यक्रम, महिला व बालविकास योजना जिल्हा परिषदेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, जिल्हा अल्पसंख्यांक विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना तसेच पालिका विकासकामांचा आढावाही घेतला.