परशुराम घाट यातील चौपदरीकरणाच्या कामासाठी नुकतीच सुरू झालेली एसटीची वाहतूक सहा तास ठप्प होणार आहे. मंडणगड, खेड, दापोलीसहीत दक्षिण रत्नागिरी, या बरोबरच सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणार्या एसटी वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. महामार्ग एसटीसाठी देखील पाच तास बंद राहणार आहे. लोटे एमआयडीसीतील कंपन्यांनी लाईटवेट वाहनांची व्यवस्था केली आहे. प्रशासनाने एसटीसाठी खोपी फाटा मार्गे कळंबस्ते फाटा असा महामार्गाला समांतर असणार्या पर्यायी मार्ग एसटीसाठी खुला करून द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक महिनाभर पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. दि. ही वाहतूक २५ एप्रिल ते २५ मे अशी तब्बल एक महिना आंबडस, चिरणी मार्गे वळविण्यात येणार आहे. परशुराम घाटा दरम्यान महामार्ग सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाने हलकी चारचाकी व दुचाकींना वाहतुकीस परवाना देण्यात येणार आहे. अवजड वाहतूक मुंबई-पुणे मार्गे कराड रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.
जमिनीच्या मोबदल्याच्या वादातून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम गेली तीन वर्षापासून रखडले होते. त्यामुळे संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग विभागाला दोन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने केलेल्या हस्तक्षेपानंतर न्यायालयाने हे काम तातडीने सुरू कऋण पूर्ण करण्याचे आदेश दिले. यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली.
मात्र, आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर भविष्यातील धोका लक्षात घेऊन एक महिना परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवून युद्ध पातळीवर काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत परशुराम घाट वाहतुकीस बंदचा आदेश काढला आहे.