कोकणातील रिफायनरी बाबत आता काहीना काही सकारात्मक हालचाली होताना दिसत आहेत. शिवसेनेची भूमिका अद्याप देखील स्पष्ट नाही. पण, त्याचवेळी शिवसेनेचे स्थानिक अर्थात राजापूर-लांजा या विधानसभा मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी कोयना धरणातील पाणी रिफायनरी प्रकल्पासाठी वळवावे अशी मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी हे पत्र दिल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असल्याचं आता समोर येत आहे. प्रकल्पाला तब्बल २ ते २.५ टीमएसी पाणी दरवर्षी लागणार आहे. कोयना धरणामध्ये वीजनिर्मिती झाल्यानंतर पाणी कोळकेवाडी धरणामध्ये सोडले जाते. त्यानंतर हेच पाणी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या माध्यामातून अरबी समुद्राला येऊन मिळते.
जवळपास ६७.५ टीमएसी इतके हे पाणी आहे. त्यामुळे सदरचे पाणी रिफायनरीसाठी वापरावे. शिवाय, कोयना धरणातून पाणी आणण्यासाठी १२० किमी पाईपलाईनची गरज भासणार आहे. त्यामुळे संगमेश्वर, लांजा, चिपळूण आणि राजापूर तालुक्यातून ही पाईपलाईन येत असताना त्याचा फायदा हा काही गावांना देखील होणार आहे. परिणामी, पाण्याचं संकट देखील संपेल असा उल्लेख देखील या पत्रामध्ये केला आहे.
मुख्य बाब म्हणजे अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर राजापूर शहरात दरवर्षी पाणी भरते. नद्यांमधील गाळ हे या ठिकाणचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून गाळ उपसा देखील केला जाऊ शकतो असा उल्लेख या पत्रामध्ये केला गेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिले आहे.