जिल्ह्यातील अनेक धरणे, पाण्याचे स्त्रोत दुरुस्तीला आलेले आहेत. त्यामुळे विविध पक्षांचे पदाधिकारी आपापल्या भागातील धरण, कालवे, सांडवा यांच्या डागडुजीसाठी निधी मिळविण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. नैसर्गिक संपदा आणि पाण्याचे स्त्रोत जपण्यासाठी शासन देखील प्रयत्नशील आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या निधीसाठी सरकार त्वरित निधी मंजूर करत आहे.
काँग्रेसच्या माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील जुवाठी व कशेळी येथील धरणांच्या दुरूस्तीसाठी सुमारे चार कोटी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये जुवाठी येथील धरण दुरूस्तीसाठी सुमारे २ कोटी ७ लाख तर कशेळी येथील धरण दुरूस्तीसाठी दोन कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले.
जुवाठी धरणाचा दरवाजा नादुरुस्त झाला असून भिंत देखील दुरुस्तीला आलेली आहे. तर धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने दगडी बांधकाम कालबाह्य होत चालले आहे. यातील दगडी भिंतीमधून पाण्याचा पाझर होऊ लागल्यास धरणाला तसेच आजूबाजूच्या परिसरातील घरांना धोका संभावू शकतो. त्या अनुषंगाने दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. कशेळीतील सांडवा व इतर ठिकाणी गळती होत असल्याने दुरुस्ती अगोदरच प्रस्तावित करण्यात आली आहे.
या दोन्ही धरणांच्या दुरूस्तीला प्रशासकीय मान्याता देतानाच निधीही उपलब्ध करून देण्यात आल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले. ही दोन्ही धरणे नादुरूस्त झाली होती व गळतीही लागली होती. यासाठी अॅड. सौ. खलिफे यांनी मृदु व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन या धरणांच्या दुरूस्तीसाठी निधी मिळावा, अशी मागणी केली होती. त्या पाठपुराव्याला यश आल्याचे अॅड. खलिफे यांनी सांगितले.