सततच्या बदलत्या वातावरणामुळे काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी लोक उष्म्याने हैराण झाली आहेत. हवामान खात्याचा अंदाजे व त्या हवाल्याने मत्स्य विभागाकडून देण्यात आलेला चक्रीवादळचा इशारा दुसऱ्या दिवशी रद्द समजावा असे सांगण्यात आले होते. कोकणाला चक्री वादळाचा कोणताही धोका नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परतु, जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांचीच माहिती अधिकृत समजावी असेही प्रशासनाने सांगितले. पण चक्रीवादळाच्या वाऱ्याचा परिणाम काही प्रमाणात राजापूर तालुक्यातील काही भागामध्ये झालेला असून अनेक घरांची पडझड झाली आहे.
जिल्हयात राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात बुधवारी सायंकाळी उशिरा चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा तळकोकणाच्या जवळ असलेल्या या परिसरामध्ये वादळाने धुमाकूळ घातला. कणकवली येथे सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
राजापूर तालुक्याच्या परीसरामध्ये जोरदार झालेल्या चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीचा तडाखा बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने रायपाटण, पाचल मध्ये जोरदार पडझड झाल्याचे दृष्टीस पडले आहे. ऐन मोसमात आंबा काजू हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच या वादळाने पुन्हा आंबा,काजू बागांना मोठे नुकसान पोहोचले आहे. अनेक बागा या वादळामध्ये उध्वस्त झाल्या आहेत. अनेकांच्या घरांवर आजूबाजूची झाडे उन्मळून पडली. छपरांवरील कौले, पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून त्वरित नुकसानीचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जनतेकडून होऊ लागली आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बुधवारी रात्रीपासून मोबाईल, दुरध्वनी सेवा आणि वीज पुरवठा देखील खंडीत झाला आहे. तर गावातील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडीमध्ये विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने गावासह लगतच्या परीसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. गुरुवारी दुपारपर्यंत तो सुरळीत करण्यात महावितरणाला यश आले नव्हते. सायंकाळी अचानक वादळी वारे वाहू लागले. काही क्षणातच वादळी वाऱ्याचे रूपांतर चक्रीवादळ सदृष्य परिस्थितीत झाले व क्षणार्धात अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. या वादळात अनेकांच्या घरावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यांमध्ये घरांचे आतोनात नुकसान झाले.