पुढील ५ दिवसांत केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत भागात तसेच कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यात २२ जून ते २५ जून दरम्यान अत्यंत जोरदार म्हणजे २०४.४ मिलिम ीटरपर्यंत पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. या भागात २३ ते २५ जून दरम्यानही अत्यंत जोरदार पाऊसाची शक्यता असल्याचे सांगत हवामान विभागाने येथे रेड अलर्ट जारी केला आहे. २२ जून रोजी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरीसह मराठवाडा विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर सिंधुदुर्गमध्ये २२ ते २५ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे ऑरेज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी पुणे, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा, गडचिरोली जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. साताऱ्यात २५ जून रोजी मुसळधारेची शक्यता असल्याने येथे ऑरेज अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत २५ जूनपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.
मान्सून कुठे पोहोचला? – नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, विदर्भाचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, गंगेच्या पश्चिम बंगालचा काही भाग, उप-हिमालयीन पश्चिम बंगालचा काही भाग आणि झारखंडच्या काही भाग व्यापला आहे.