वहाळात दोरी बांधून तिच्याआधारे वहाळातून घरी जाताना अचानक पाण्याचा लोंढा आला आणि रिक्षाचालक या लोंढ्याबरोबर वहाळात वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह त्याच वहाळात सापडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. वहाळ पार करण्यासाठी बांधलेली दोरी तुटली आणि त्याचबरोबर त्याच्या आयुष्याची दोरीदेखील कापली गेली, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बुधवारी रत्नागिरी तालुक्यात वाहून जाण्याच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना ही वाटद खंडाळा येथे घडली होती. त्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला तर ओंकार जाधव नामक तरूण नदीत वाहून गेला होता. गुरूवारी सायंकाळी उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.
दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती तर दुसरी घटना सायंकाळी तालुक्यातील गोळप येथे घडली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मौजे गोळप नवेदरवाडी येथील रवींद्र कृष्णा भाटकर (वय ५०) हे नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून घरी जायला निघाले होते. भाटकर हे रिक्षा चालक असून ते पार्टटाईम एका बँकेत वॉचमनचे काम करतात. बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास तें नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन घरी जायला निघाले. नवेदरवाडी येथे रिक्षा उभी करून ते वहाळात बांधलेल्या दोरीच्या आधारे पाण्यातून मार्ग काढत घरी चालले होते. त्याचवेळी अचानक पाण्याचा लोंढा आला आणि वहाळात बांधलेली दोरी तुटल्याने भाटकर हे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले.
याची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली. रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह मिळून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान भाटकर यांना घरी जाण्यासाठी दुसरा मार्ग होता. मात्र ते नेहमी याच वहाळाचा वापर करीत असत. पावसाळ्यात वहाळाला पाणी येत असल्याने त्यांनी वहाळात एक दोरी बांधली होती आणि त्या दोरीच्या आधारे ते वहाळातून चालत जाण्याची कसरत करीत होते. ही कसरत त्यांच्या जीवावर बेतली आहे.