मागील आठवडाभर, रत्नागिरी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये अनाधिकृत लसीकरण मोहीम राबवली जात असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्याचप्रमाणे ऑफलाईन लसीकरणासाठी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन लसीकरण करण्यात यावे अशीही मागणी जोर धरत असताना, आता लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम असून देखील त्याची कोणालाही माहिती न देता, ठरावीक लोकांनाच बोलावून लसीकरण केले जात असल्याचे वृत्त कानावर येत आहे. आणि अशा प्रकारे चोरीछुपे लस दिली जात असेल तर ते पुर्णतः अयोग्य असून यातून काय साध्य केले जाणार आहे? रत्नागिरी शहरामध्ये या गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असून याविरोधात राज्याच्या व केंद्राच्या आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा द.रत्नागिरी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.
नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सध्या व्हायरल होत आहे. यामुळे अनधिकृतपणे लसीकरण होत असल्याबद्दल समाज माध्यमांमध्ये बातम्याही व्हायरल झाल्या आहेत. शहरामध्ये सध्या मिस्त्री हायस्कूल, कोकणनगर आणि पटवर्धन हायस्कूल या तीनच केंद्रावर ऑनलाइन लसीकरण केले जाते. परंतु संत गाडगेबाबा सभागृहाचे नाव कुठेही दिसण्यात आले नाही आणि संत गाडगेबाबा महाराज सभागृहामध्ये लसीचे डोस दिले जात असल्याने या सुरू असलेल्या तीन केंद्रांवर उपलब्ध असणारा लससाठा फक्त १०० किंवा २५० च्या दरम्यानच मिळतो. रत्नागिरीवासीयांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी निदान एक हजार लस साठा तरी उपलब्ध झाला पाहिजे, असे स्पष्ट मत पटवर्धन यांनी मांडले आहे.
नगरपरिषदेच्या संत गाडगे महाराज सभागृहात ऑफलाइन लसीकरण नगरसेवकांना दिलेल्या कोट्यातून केले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु शहरवासियांना जर लस मिळत नसेल, तर हे नगरसेवक कुठच्या लोकांना लस देत आहेत व याचे अधिकृत प्रमाणपत्र मिळते का याची शहानिशा करणे अत्यंत गरजेचे आहे. मागे एका अनधिकृत लसीकरणाचा अनुभव गाठीशी आहे, दुसरा डोस घेण्यासाठी या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.