ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न गेल्याने रविवारी परशुरामनगरमधील दुकान, घरांतून पाणी शिरले. महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे परशुरामनगर परिसरात ही समस्या निर्माण झाली आहे. गेली अनेक वर्षे ही समस्या भेडसावत असताना त्यावर महामार्ग विभाग कोणत्याही उपाय योजना करत नाही. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे येथील नागरिकांच्या समस्येत नवीन भर पडली आहे. चिपळूण शहारातील मुंबई-गोवा महामार्गावर हॉटेल अभिरुची शेजारी असणाऱ्या पोंक्षे घराशेजारील छोटा नाला आहे.
येथून मोठ्या प्रमाणात पाणी महामार्गावर येत आहे. हेच पाणी हळूहळू महामार्गाच्या सिमेंट काँक्रिट गटारात जाते; पण हे पाणी त्या गटारात जाईपर्यंत महामार्गावर नदी तयार होते. तसेच ओझरवाडीतील कांबळी घराशेजारील पऱ्याही महामार्ग गटाराला जोडला तर उमेश सकपाळ यांच्या कार्यालयासमोर पाण्याची नदी वाहणार नाही. या सर्वांचा फटका परशुराम नगरमधील रहिवाशांना होत आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर प्रशांत बुक डेपो परिसरात जलद पाणी भरते. रविवारी झालेल्या पावसात प्रतीक आवास सोसायटीमध्ये पायरीला पाणी लागले होते. तेथील एका सोसायटीची विहीर पूर्ण चिखलाने भरली. तसेच परकार चाळीच्या मार्गावर पूर्ण नदी तयार झाली. त्यामुळे खेडेकर रेशन दुकानाकडे नागरिक जाऊ शकत नव्हते.