मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली आवाज काढण्याची भाषा वापरल्याबद्द्ल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाड आणि नाशिक या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नाशिक पोलिसांना नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांचं पथक नारायण राणे यांच्या अटकेसाठी चिपळूणकडे रवाना झाले आहे. या घटनाक्रमाबद्दल बोलताना नारायण राणे यांनी हे उत्तर दिले.
केंद्रात आमचही सरकार आहे. माहितीच्या आधारे मी एकही उत्तर द्यायला बांधील नाही. मी केंद्रीय मंत्री आहे, सामन्य माणूस नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. आणि शिवसैनिकांना तर मी भिक घालत नाही. जेंव्हा मुख्यमंत्री स्वत: चिथावणीखोर बोलतात तेव्हा गुन्हे दाखल होत नाही आणि मी बोलल्यावर लगेच गुन्हे दाखल होतात! केंद्रीय मंत्र्याच्या अटकेचे कोणी आदेश काढले? राष्ट्रपती कि पंतप्रधान ? अशा खरमरीत शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची मला माहिती पण नाही, जे सोशल मिडीयावर मेसेज येत आहेत तेवढेच मला कळले. पोलीस पथक निघाले, अटक होणार, तुम्हाला काय नॉर्मल माणूस वाटलो काय, शिवसेना कोण, एखाद्या नेत्याचं नाव सांगा, कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही, माझी नाहक बदनामी कराल तर तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा सज्जड इशाराच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रश्नकर्त्या पत्रकारांना दिला आहे.
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेत राणेंनी उत्तर दिलं. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा आणि मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नाहीतर तुमच्या विरोधातच माझी केस दाखल होईल. एवढ ध्यानात असू द्या.