शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नारायण तलाव परिसरात अखेर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर राहणार आहे. चिपळूण नगरपालिकेच्यावतीने या परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून बंद होते. आता नगरपालिकेने तातडीची कार्यवाही करीत हे सर्व कॅमेरे पुन्हा सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नगरपालिकेने सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा खर्च करून नारायण तलावाचे सुशोभीकरण केले आहे. या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांची वर्दळ असते. लहान मुले, विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला तसेच वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने येथे चालण्यासाठी, विश्रांतीसाठी, खेळण्यासाठी येत असतात.
सार्वजनिक ठिकाण असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने तसेच परिसरातील मालमत्ता सुस्थितीत राहावी यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे, बसविण्यात आले होते; मात्र गेले कित्येक महिने ते बंद होते. चार ते पाच दिवसांपूर्वी नारायण तलाव परिसरात काही मुद्द्यांवरून चिपळूणमध्ये नवा वाद निर्माण झाला होता. याबाबत काही नागरिकांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनाही निवेदन दिले; मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे तिथे घडलेल्या घटनेविषयी माहिती मिळू शकली नव्हती. भविष्यात सार्वजनिक ठिकाणी कोणताही वादग्रस्त प्रसंग पुन्हा घडू नये, यासाठी पालिकेने तातडीने पावले उचलत नारायण तलाव परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू केले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळा – नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सीसीटीव्ही दुरुस्तीविषयी पालिका प्रशासनाला सूचना केली होती. त्याप्रमाणे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी तत्काळ कार्यवाही केली. त्यामुळे आता नारायण तलाव परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने अधिक काटेकोर नजर राहणार आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

