गेल्या चार दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे चिपळूण जवळील प्रसिद्ध अशा परशुराम घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घाटातील डोंगराचा भाग खचू नये म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून एक मोठी गॅबियन वॉल (लोखंडी जाळीत दगड भरून तयार केलेली संरक्षक भिंत) उभारण्यात आली होती. मात्र, पहिल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसातच या भिंतीच्या पायाखालची माती पूर्णपणे वाहून गेली आहे. इतकंच नाही, तर काही ठिकाणी या भिंतीला मोठे तडे गेल्याचेही पाहायला मिळत आहे. यामुळे ही भिंत कधीही कोसळू शकते, अशी भीती आता वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
भिंतीची ही दुरवस्था पाहून महामार्गाच्या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. “कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही जर पहिल्याच पावसात ही अवस्था होत असेल, तर प्रशासनाने नेमकं काय नियोजन केलं?” असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.
गुहागर बायपास रोडवरही निसर्गाचा कोप
दुसरीकडे, चिपळूण शहरातील गुहागर बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी रात्री अचानक दरड कोसळली. डोंगराचा एक मोठा हिस्सा आणि अजस्र दगड खाली आले. सुदैवाने, ही दरड मुख्य रस्त्यापासून थोडी बाजूला कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
परंतु, परशुराम घाटातील धोकादायक भिंत आणि बायपासवरील ही दरड, या दोन्ही घटनांमुळे सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. पावसाळ्यात या घाटातून प्रवास करताना प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे बनले आहे.

