संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांवर होणारी बेदरकार वाहतूक आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे आणखी एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. ताम्हाने-कोसुंब मार्गावर बुधवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातात आंबवली गावातील प्रतीक सावंत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चिरे (जांभा दगड) वाहून नेणाऱ्या एका भरधाव ट्रकने प्रतीकच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक सावंत हा दुचाकीवरून जात असताना ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर समोरून वेगाने येणाऱ्या चिरेवाहू ट्रकने (क्रमांक: MH-07-1170) त्याच्या दुचाकीला थेट धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हा अपघातग्रस्त ट्रक महसूल विभागातील एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा असल्याचे प्राथमिक तपासात बोलले जात आहे.
खड्डेमय रस्ते आणि सुसाट अवजड वाहतूक ठरतेय जीवघेणी
ताम्हाने-कोसुंब मार्गाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकांना कसरत करावी लागते. त्यातच या मार्गावरून चिऱ्यांची वाहतूक करणारे अवजड ट्रक कोणतीही मर्यादा न पाळता सुसाट वेगाने धावत असतात. या वाहनांची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र (वाहनाची योग्यता) आणि चालकांचा वेग यावर वाहतूक विभाग किंवा स्थानिक प्रशासनाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही, असा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप
प्रतीकच्या निधनामुळे आंबवली गाव आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. निष्काळजी वाहनचालकांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, नियमबाह्य अवजड वाहतुकीला लगाम घालावा आणि रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी आक्रमक मागणी आता संतप्त नागरिकांमधून केली जात आहे.

