रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोकाट जनावरांचा वावर आणि त्रास वाढला आहे. त्यामुळे अनेकवेळा जीवघेणे अपघात सुद्धा घडून येतात. अनेकांना स्त्यावर बसलेली जनावरे काळोखामध्ये नजरेस पडत नाहीत. त्यामुळे आयत्या वेळी नजरेस आल्याने अपघात घडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अनेक वेळा वाहनचालक अशा उनाड गुरांच्या मालकांना शोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी करताना दिसत आहेत.
तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ व गुहागर वेलदूर मार्गावरील रानवी ते अंजनवेल फाटा दरम्यान रात्रीच्यावेळी मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेली असतात. त्यावेळी रात्रीच्या वेळेस प्रवास करणारे वाहनचालक या मोकाट जनावरांवर आदळून जखमी होतात, तसेच जनावरेही जायबंदी होत असतात. हे प्रकार रोजचेच झाले आहेत.
त्यामुळे यावर तात्पुरता उपाय म्हणून मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून त्यांच्या शिंगांना रेडियम लावण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेसैनिक करीत आहेत. जेणेकरून वाहनाच्या हेड लाईट पडल्यावर ते चमकतील आणि वाहन चालक वेळीच सावध होऊन अपघात घडण्यापासून वाचेल.
त्यामुळे रात्रीच्यावेळी जरी रस्ता अडवून जनावरे बसली तरी रेडीयम चमकल्यामुळे ती रस्त्यवर असल्याचा अंदाज वाहन चालकांना येतो. या उपक्रमामुळे तालुक्यातून मनसे कार्यकत्यांचे कौतुक केले जात आहे. अंजनवेल विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, उपविभाग अध्यक्ष स्वप्निल कांबळे, शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर, पालपेणे शाखा अध्यक्ष कौस्तुभ कोपरकर, विष्णू परब, वेलदूर शाखाध्यक्ष रुपेश घवाळे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
वाहनचालकांमधून सुद्धा या मनसेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. कारण अनेक वेळा या उनाड गुरांच्या त्रासामुळे बराच काळ ती बाजूला होईपर्यंत वाहतूक सुद्धा खोळंबून राहते.