राजापूरचे क्रियाशील आमदार राजन साळवी यांना धमकी दिल्याच्या प्रकाराने जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’, असे म्हणत आमदार राजन साळवी यांना व त्यांच्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. आमदार राजन साळवी यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शहर पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली आहे.
आमदार राजन साळवी हे राजापूरचे शिसेनेचे आमदार म्हणून २००९ सालापासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या सोबत राहून त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांना एका निनावी क्रमांकावरुन पहिला फोन आला. यावेळी मोबाईलवरुन अज्ञाताने ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’ एवढे बोलून फोन बंद केला. त्यानंतर त्याच दिवशी पुन्हा रात्री सव्वा अकराच्या दरम्यान फोन करुन’ रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे ‘ अशी धमकी देण्यात आली.
आमदार साळवी यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे सांगितले. राजापूरचे आमदार राजन साळवी यांना नाणारच्या प्रकल्पाला विरोध करण्यावरून संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याच्या निनावी फोनवरून आलेल्या धमकीमुळे जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आमदार राजन साळवी यांना फोन करून सविस्तर माहिती घेतली. तसेच आ. साळवी यांच्या घरासाठी पोलीस बंदोबस्त देण्यासाठीच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच गरज वाटल्यास आणखी सुरक्षा वाढवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.