गेल्या काही वर्षांमध्ये दिवाळीनंतर नोव्हेंबर ते मे महिन्यामध्ये डोंगरावर सड्यावरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सातत्याने वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये शेतकर्यांना वर्षभर मेहनत करून विकसित केलेल्या बागा, गवत जळून खाक होताना लाखो रूपयांचा नुकसान सोसावे लागत आहे. सड्यावरील सुकलेले गवत गावातील गुरांसाठी वैरण म्हणून वापरले जायचे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरानजीकच्या शीळ येथील डोंगर परिसर वणवा लागला असून, लागलेल्या वणव्यात गुरांच्या वैरणीच्या गवतासह डोंगर भागामध्ये शेतकर्यांनी विकसित केलेल्या आंबा, काजूच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गवत जळून खाक झाल्याने गुरांच्या वैरणीचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
दरवर्षी याच काळामध्ये वणवा पेटत असल्याने, नक्की तो नैसर्गिकरित्या लागतो की, जाणूनबुजून लावला जातो याचा शोध घेण्याची मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे. सड्यावर मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, त्यात सूर्याच्या किरणांची पोहोचणारी थेट झळ आणि सोसाट्याने वाहणारा वारा त्यामुळे मागील दोन दिवसापासून लागलेय या वणव्याची झळ शीळ गावासह लगतच्या गोठणे दोनिवडे भागालाही बसली आहे. सड्यावर गुरांना चारण्यासाठी असलेले गवतही जळून खाक झाले आहे.
वणव्यामध्ये डोंगर होरपळत असताना १३ रोजी रात्री उशिरापर्यंत शीळ येथील मोठ्यासंख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी वणवा आटोक्यात आणला. संपूर्ण आंबा काजूची वनराई जळून नष्ट होण्याआधी ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणल्याने काही प्रमाणात वनराईचे रक्षण झाले आहे. नाहीतर वर्षभर पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या बागा डोळ्यासमोर आगीच्या भक्षस्थानी जाताना पाहताना हृदय हेलावून जाते. नक्की या वणवा लागण्यामागे काय कारण आहे हे शोधून काढण्याची शेतकर्यांची मागणी जोर धरत आहे.