लांजा पोलिसांच्या सतर्कतेमुळे साडे बारा वर्षापूर्वी बेपत्ता झालेला ५० वर्षीय सांगलीमधील इसम आपल्या कुटुंबाला भेटला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमान गणपत शिंदे वय ५० वर्षे या तब्बल साडेबारा वर्षांनी सापडल्या व्यक्तीचे नाव आहे.सांगली जिल्ह्यातील व कडेगाव तालुक्यातील चिंचणी आवक येथील ही हा व्यक्ती असून मे २००९ मध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली होती.
हनुमान शिंदे हा थोडासा वेडसर असल्याने कुटुंबीयांनी त्याला रत्नागिरी येथील मनोरुग्णा रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. मे २००९ मध्ये सदर हनुमान शिंदे यांना रत्नागिरी येथे आणले जात असताना काही काळासाठी रत्नागिरी मारुती मंदिर येथे गाडी थांबवून कुटुंबीय चहा नाष्टासाठी उतरले होते. यावेळी हनुमान हा गाडीत बसून होता. मात्र कुटुंबीय चहा नाश्ता करून यायच्या अगोदरच हनुमान हा कोणाला काही न सांगता, गाडीतून उतरून अचानक निघून गेला. त्याचा सर्वत्र शोध घेऊन देखील तो न सापडल्याने कुटुंबीयांनी मे २००९ मध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हनुमान शिंदे हा बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. तेंव्हापासून मोठ्या प्रमाणात तपास सुरू होता.
या पार्श्वभूमीवर लांजा पोलिस ठाण्याचे पथक यामध्ये पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, उपनिरीक्षक प्रशांत जाधव ,पोलीस नाईक दिनेश आखाडे, महिला पोलीस नाईक संतोषी मिसाळ, महिला हेडकॉन्स्टेबल तृप्ती सावंत देसाई, महिला पोलीस एन. पी. खामकर आदी सर्वजण रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गाव भेट दौरासाठी जात असताना वाकेड येथे एक वेडसर व्यक्ती रस्त्याने चालत असलेली दिसली.
लांजा पोलिसांनी तिथे गाडी थांबवली आणि त्यानंतर येथील ग्रामस्थांनी या वेडसर व्यक्ती बद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सहजच या वेडसर व्यक्तीची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्या व्यक्तीने आपले नाव आणि पत्ता सांगितले. त्यावर शोध घेतला असता, सांगितलेली माहिती खरी असल्याचे लक्षात आल्यावर यांना रत्नागिरी शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आणि त्यांचे नातेवाईक ताबडतोब रत्नागिरीमध्ये दाखल झाले. हनुमान शिंदे यांच्या कुटुंबीयांनी लांजा आणि पोलिसांना विशेष धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.