महाराष्ट्र सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा देणार्या कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणली आहे. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यासाठी शासनाने जिल्हा शल्यचिकित्सकाना कळविले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा रुग्णालयाची सेवाही विस्कळीत झाली आहे. त्याची झळ जिल्ह्यातील गरीब सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. याबाबतचा जाब विचारण्यासाठी नीलेश राणे यांनी गुरूवारी जिल्हा रुग्णालयाला थेट भेट दिली.
रुग्णालयातील या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना या सर्व प्रकरणाचा जाब विचारला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ श्रीपाद पाटील म्हणाले एनएचएम म्हणून नियुक्ती दिलेल्या १३० कर्मचाऱ्यांपैकी आता ५१ मध्येच कमी होणार आहेत. मात्र एकही पद कमी होता नये जर तसे झाले तर भाजप त्या दिवसापासून आंदोलन सुरू करेल असेही निलेश राणे यांनी स्पष्ट सांगितले.
गरीब जनतेला मिळणारी जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवा मिळाली नाही आणि जर कोणाचा जीव गेला तर मग आम्ही गप्प बसणार नाही, या सगळ्याला आपल्यालाच जबाबदार धरू तसेच या जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार खासदार आणि मुख्यमंत्र्यांनाही जबाबदार धरू अशी तंबीही यावेळी नीलेश राणे यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मोठेपणासाठी जिल्हा रुग्णालयाच्या सेवा सरकार मोडीत काढत आहे. एनएचएम मधील १५१ कर्मचारी व अधिकारी कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सेवाही कोलमडून गेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे बिकट अवस्था झाली आहे. त्यातच आता जिल्हा रूग्णालय सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मात्र यामध्ये जर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या तसेच या गोंधळात जिल्ह्यातील गरीब जनतेला मिळणाऱ्या रुग्णसेवेत काही हयगय झाली आणि कोणाचा हकनाक बळी गेला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभे करू असा इशारा भाजप नेते, प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.